नगर -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत घडलेल्या प्रकाराची चौकशी करुन समाजकंटकांवर योग्य कायदेशीर कारवाई करावी. तसेच या मिरवणुकीत सहभागी असलेल्या मिलिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत समस्त आंबेडकरी समाजबांधवांच्यावतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले.
शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये आशा टॉकिज चौक परिसरात अज्ञात समाजकंटकांनी मिरवणुकीमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणाची योग्य चौकशी करावी. तसेच मिलिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. तसेच खऱ्या आरोपींवर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अशोक गायकवाड, अजय साळवे, सुरेश बनसोडे, परिमल निकम, सुशांत म्हस्के, सुमेध गायकवाड, महेश भोसले, नितीन कसबेकर, रोहित आव्हाड, विशाल भिंगारदिवे, विशाल गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.