प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास
पुणे – मागील विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात सर्वांनी पक्ष संघटना बूथ कमिटी यावर एकसंधपणे काम केले. पण, थोड्या फरकाने पक्षाला अपयश आले. मतदार यादी व बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास, येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महापौर होणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
“संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी’ या संकल्पनेसह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात “राष्ट्रवादी परिवार संवाद’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेचे शनिवारी पुण्यात आगमन झाले. यावेळी पाटील बोलत होते.
यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे शिवाजीनगर, कोथरूड, कसबा व खडकवासला या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली.
पवार म्हणाले, “नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. शहरात प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला झोकून देत पुणेकरांच्या सेवेत उतरावे. सरकारचे सर्व निर्णय शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचवावेत.’ यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, जयदेवराव गायकवाड, वनराज आंदेकर, सुनील खाटपे, गणेश नलावडे, दीपक पोकळे, प्रवीण तरवडे, शिल्पा भोसले, संतोष जोशी, संदीप नवघणे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सेल अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.