नगर -करोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य कुटुंबातील करोना रुग्णांची होणारी हेळसांड व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत ती थांबविण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भातील मागणीने निवेदन देऊन ही पिळवणूक न थांबल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आरपीआयचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख तथा शहराध्यंक्ष अमित काळे, माजी नगरसेवक अजय साळवे, विनोद भिंगारदिवे, प्रवीण वाघमारे, गौतम कांबळे, चंद्रकांत भिंगारदिवे, युवराज पाखरे, दीपक गायकवाड, संदिप वाघचौरे, पप्पू पटेल, राहुल विघावे, भाऊसाहेब ठोंबे, प्रकाश भिंगारदिवे आदिंसह अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
करोना महामारीत सर्वसामान्य करोनाबाधित रुग्णांची व त्यांच्या कुटुंबीयांची हेळसांड व पिळवणूक होत आहे. शासकीय रुग्णालयात बेड असून देखील दुसरीकडे जाण्यास सांगितले जात आहे. खासगी रुग्णालये उपचारासाठी भरमसाठ शुल्काची मागणी करत आहेत. या आर्थिक लुटीतून सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. ती तत्काळ न थांबल्यास आरपीआयच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालय, बुथ हॉस्पिटल व इतर सामाजिक संस्था, संघटना तसेच मनपाने सुरु केलेले कोविड सेंटरमध्ये शिल्लक असणाऱ्या बेडची संख्या जनतेच्या माहितीकरिता प्रसार माध्यमांद्वारे दररोज प्रसारित करावी, खासगी हॉस्पिटलच्या उपचाराचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करुन या दराप्रमाणे रुग्णांना सेवा मिळण्यासाठी खासगी हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.