मुंबई – राज्यातील नाट्यकर्मींसाठी आनंदाची बातमी असून लवकरच नाट्यगृहांमधील पडदा उघडणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदच्या सदस्यांनी आज (शुक्रवार 3 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष नवनाथ मच्छिंद्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी उपस्थित होते.
रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे यांनी आणि ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे आदेश बांदेकर, सुबोध भावे या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाट्यगृह 50% प्रेक्षक उपस्थितीमध्ये 5 नोव्हेंबर 2021 पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील नाट्यगृह उघडण्यासाठी 9 ऑगस्टला रंगकर्मी-रंगधर्मींचे आंदोलन झाले होते. अटी-शर्तींसह का असेना पण हे सांस्कृतिक क्षेत्र काही प्रमाणात तरी खुली करावी, ही मुख्य मागणी होती. यानंतर सरकारने ठोस निर्णय घ्यावा अपेक्षा होती.
उशीरा का होईना नाट्यगृह सुरु होत असल्याने नाट्यकर्मींनी समाधान व्यक्त केले आहे. मागील वर्षभरापासून नाट्यकलाकार आणि या संदर्भातील मंडळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करत होते. अखेर हा निर्णय घेण्यात आल्याने आता आमची रोजीरोटी सुरु होईल, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.