धनंजय मुंडेंनी दिले तत्काळ जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश
बीड : हक्काच्या जमिनीसाठी सरकारी कार्यालयाला चकरा मारणाऱ्या शहिदाच्या पत्नीला अखेर न्याय मिळाला आहे. सामजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भाग्यश्री राख यांना तत्काळ जमीन उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश आहेत.
धनंजय मुंडे यांनी स्वतः फोन करून भाग्यश्री यांची विचारपूस करत शासन निर्णयाप्रमाणे 2 हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे प्रशासकीय दफ्तर दिरंगाईने त्रास सहन करणाऱ्या शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना अखेर न्याय मिळणार आहे.
पाटोदा तालुक्यातील थेरला येथील शहीद जवान तुकाराम राख हे 1 मे 2010मध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झाले. त्यांच्यानंतर भाग्यश्री या एकट्या संघर्ष करत कुटुंब चालवत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या 28 जून 2018च्या शासन निर्णयान्वये शहिदांच्या वारसांना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे.
दरम्यान, अधिकारी कुठलेही सहकार्य करत नाहीत, उडवाउडवीची उत्तरे देतात. माझी फाईल पूर्ण असताना देखील वर्षभरापासून सही होत नाही. मी एकटीने किती वेळा चकरा मारायच्या, असा संताप भाग्यश्री यांनी व्यक्त केला होता. तसेच या बाबतीत सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना देखील निवेदन दिले होते.