पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत प्रसाद चौगुले हे राज्यातून सर्वसाधारण गटातून पहिले आले आहेत, तर मागासवर्गीय गटातून रोहन कुवर, तर महिला गटातून मानसी पाटील या राज्यात प्रथम आल्या आहेत.
मुख्य परीक्षेच्या एकूण 420 पदांचा सुधारित अंतिम निकाल आज एमपीएससीने जाहीर केला. हा निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारस पात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे कटऑफ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिव्यांग वर्गवारीतील उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शिफारस शासनाकडे करण्यात येत आहे.
तसेच नेमणुकीपूर्वी उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे की नाही याची देखील वैद्यकीय मंडळाकडून तपासणी केल्यानंतर पात्र ठरतील. अंतिम निकालात शिफारस पात्र न ठरलेल्या ज्यांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविल्याच्या तारखेपासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.