मुंबई : “करोना’ व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी उपाययोजना आखले जात आहेत. राज्यभरातील थिएटर आणि नाट्यगृह मार्चअखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता टीव्ही मालिका-चित्रपटांचे शूटिंगही बंद करण्यात येणार आहे.
येत्या गुरुवारपासून म्हणजे 19 मार्चपासून 31 मार्चपर्यंत देशभरातील सर्व टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे चित्रीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. “करोना’मुळे भारत सरकारने वैद्यकीय आणीबाणी जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन (इम्पा), फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनच्या बैठकीत एकमताने याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.
करोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी केंद्राने घेतलेल्या निर्णयांना आमचा पाठिंबा आहे, असेही पत्रकात जाहीर करण्यात आले आहे.
मालिका-चित्रपटांचे शूटिंग थांबेपर्यंत सेटवर सर्व काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 30 मार्चला परिस्थिती पाहून चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.