- आरोग्यावर परिणाम : दुर्गंधी, डासांची उत्पत्तीने नागरिक हैराण
चऱ्होली – स्मशानभूमी घाटाजवळील इंद्रायणी नदीपात्र जलपर्णीने व्यापले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून नदीपात्र कोरडे पडले आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांची उत्पत्तीत वाढ झाली आहे. नदीपात्रात जलपर्णी वाढल्याने पाण्याला उग्रवास येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांच्या प्रादुर्भावाने लहान मुलांना ताप, खोकला, श्वसनाच्या तक्रारी वाढत आहेत.
तेव्हा प्रशासनाने नदीपात्रातून काढण्यात आलेली जलपर्णी नदीच्या काठावर टाकून सुकल्यानंतर पेटविल्या जात असल्याने वातावरण दूषित होण्यास आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे. आज संपूर्ण जगात करोनाची भीती आहे. सर्व यंत्रणा याकडे लक्ष देऊन आहे. परंतु वर्षोनुवर्षे भेडसावणाऱ्या समस्यांकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
नदीपात्रात वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी व ती नामशेष करण्याबाबत महापालिका प्रशासन सर्वच स्तरावर नापास झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील अनेक पर्यावरणप्रेमी संस्था “जलपर्णी मुक्त’ अभियान राबवून नदीपात्र मोकळे करतात. मात्र, काही दिवस जाताच परत जलपर्णी आपले उग्र रूप धारण करून विळखा घालते. जलपर्णी पसरल्याने नदीपात्रातील जलचर प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत.
त्यामुळे डासांच्या अंडी खाणारी पाण्यातील जलचर जलपर्णी असलेल्या भागात जिवंत राहत नाहीत. नदीपात्रात पाणी असूनही जलपर्णी वाढल्याने नदीपात्र कोरडे पडल्याचा भास होतो. जनावरांना नदीपात्रातील पाणी पिण्यास योग्य नाही, बऱ्याच ठिकाणी वापरलेल्या पाण्याच्या गटारी खुल्या जागेत व नदीपात्रात सोडून देण्यात आल्या आहेत.
नदी सुधार प्रकल्प कागदावरच
मरणावस्थेत असलेल्या शहरातील नदीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने नदी सुधार प्रकल्पाची योजना आखली होती. या योजनेंतर्गत नदीपात्र प्रदूषित होऊ नये, यासाठी नाल्यांद्वारे नदीत मिसळणारे सांडपाणी थेट न सोडता त्यावर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात प्रथम प्रक्रिया केली जाते. त्याशिवाय, नदीपात्रातील गाळ काढणे, नदीपात्रालगतच्या परिसराचे सौंदर्यीकरण आदी बाबींचा नदी सुधार प्रकल्पात समावेश होतो. मात्र, गेल्या सहा सात वर्षांपासून या योजनेला प्रारंभ होण्याआधीच खीळ बसल्याने नदी सुधार योजना प्रकल्प फक्त कागदावरच राहिला असल्याची वास्तविकता आहे.