शिरवळ -धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडला नाही व सोडणारही नाही. जीवात जीव असेपर्यत प्रस्थापितांविरोधातील आपला लढा सुरूच राहणार आहे. आपल्या सामाजिक व राजकीय वाटचालीत खंडाळा तालुक्यातील रमेश धायगुडे पाटील यांच्यासारख्या धनगर समाजातील कार्यकर्त्यांचे व समाजाचे योगदान आहे, ते आपण विसरणार नाही. कधीही हाक मारा हा पठ्ठ्या यायला तयार आहे. खंडाळा तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशा भावना बहुजन व धनगर समाजाचे नेते विधान परिषदेतील नवनिर्वाचीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केल्या. अहिरे (ता. खंडाळा) येथे आमदार झाल्यानंतरचा पहिला सत्कार रमेश धायगुडे पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना ते बोलत होते.
यावेळी माजी सभापती रमेशदादा धायगुडे – पाटील, आटपाडीचे उपसभापती तानाजी यमगर, बाळासाहेब शेळके, ऍड. सचिन धायगुडे, दादासाहेब शेळके, जालिंदर धायगुडे, मुकुंद धायगुडे, लक्ष्मण बिचकुले, श्रेयस धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. गोपीचंद पडकर म्हणाले, सामान्य कुटुंबातील मुलाला राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी भाजपने दिली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आपला लढा सुरूच राहणार आहे. बहुजनांची पोर निर्णय प्रक्रियेत जाण्याची गरज आहे. आपण पदासाठी व स्वार्थासाठी कधीही राजकारण केले नाही. यापुढील काळातही बहुजन व धनगर समाजाला केंद्र बिंदु मानून काम करणार आहे.