दीपा देशपांडे
बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १२मार्च १९७१ रोजी आनंद हा एव्हरग्रीन चित्रपट सिनेमागृहात झळकला. चित्रपटाबद्दल सांगायचं म्हंटले तर ‘तो आला त्याने पाहिलं आणि जिंकलं’, असे खरोखर घडले. या चित्रपटाने पन्नास वर्ष पूर्ण केली तरीही या चित्रपटाने रसिकांच्या मनावर अजूनही गारुड घातले आहे.
‘आनंद’ मध्ये कुठेही तद्दन लोकप्रिय चित्रपटातील बाॅक्स ऑफीसची यशस्वीतेची समीकरणे वापरली गेली नव्हती. उदाहरणार्थ बागेतली नायक नायिकेची नाचत बागडत गाणी नव्हती तसेच सुपरहिट हीरो हीरोइनची जोडी नव्हती, दे दणादण मारामाऱ्या नव्हत्या तरीही निव्वळ साधेपणा आणि सकस कथानक, कलाकारांची अचूक निवड या ऋषिदांच्या बलस्थानांमुळे चित्रपट हीट ठरला.
‘आनंद’ मधले साधेपणातील चिरंतन सौंदर्य अबाधित ठेवून या चित्रपटास भरघोस यश मिळाले….. बरं तस पाहायला गेले तर नुकताच अभिनेता म्हणून उदयाला येऊ पाहणारा अमिताभ बच्चन ( Amitabh Bacchan ) हा या चित्रपटात सहकलाकार होता. तर व्यावसायिक सिनेमातून कायम काम करणारा सुपरस्टार राजेश खन्ना हाआनंदच्या महत्वपूर्ण भूमिकेत चपखल बसला होता. रमेश देव ,सीमा देव तसेच ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी वॉकर, ललिता पवार अशा यशवंत गुणवंत कलाकारांच्या मांदियाळीने हा चित्रपट सजला होता
चित्रपटात डॉक्टर भास्कर बॅनर्जी याची प्रेयसी सुमित्रा संन्याल रेणू या भूमिकेत तथाकथित नायिकेप्रमाणे असूनही कथानकाचा छोटासाच भाग होती. पण या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मोठ्या सर्व कलाकारांची उपस्थिती या कथानकाचे अविभाज्य अंग बनत गेली होती.
आता थोडक्यात कथानकाविषयी….चित्रपटाची सुरुवातच डॉ. प्रकाश कुलकर्णी (रमेश देव) च्या दवाखान्यात एकदम धाडकन दार उघडून सुहास्य वदनाच्या आनंदने होते. तोपर्यंत हा आनंद पेशंट असेल आणि तेही भयानक ट्युमरचा पेशंट असेल, याचा पत्ताही लागत नाही.
काही मंडळी अशी असतात की अगदी कमी कालावधीतच आपल्यातील खिलाडूवृत्तीने समोरच्याला आपलेसे करून टाकतात.असे भन्नाट रसायन असलेला, दिलखुलास स्वभावाचा आनंद हा वल्ली संपूर्ण चित्रपटाचा पडदा व्यापून टाकतो.
डॉ. प्रकाश कुलकर्णीचा मित्र डॉ. भास्कर बॅनर्जी (अमिताभ बच्चन) हा शीघ्रकोपी परंतु व्यवहारी व सच्चा प्रॅक्टिस करणारा डॉक्टर असतो. थोडा कमी भावनाशील असून देखील, आनंदच्या लाघवी, निर्व्याज प्रेमामुळे, पुढे पुढे तो डाॅ.भास्करच्या काळजात कधी अधिराज्य करतो हे त्याचे त्यालाही कळत नाही…
डॉ. कुलकर्णींच्या दवाखान्यातील मेट्रन या भूमिकेत ललिता पवारांनी अक्षरशः लाजवाब काम केले आहे. वरून काटेरी फणस पण आतून गोड गरे अशा व्यक्तित्वाची ही मेट्रन आपल्या पेशाशी पूर्णपणे एकनिष्ठ असते. तिलाही आनंद हा आपल्या मुलासारखा वाटू लागतो.
या चित्रपटाच्या कथानकातील अजून एक महत्त्वाचे पात्र म्हणजे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी साकारलेला डॉ. प्रकाश कुलकर्णी. व्यवहारात काहिसा बनेल, पण आपला मित्र डॉ. भास्कर याची खूप काळजी घेणाऱ्या सच्च्या दोस्ताचे काम चोखपणे बजावले आहे. सीमा देवांनी देखील आनंद आपला भाऊ म्हणून मानून त्याच्याशी प्रेमाचं नातं खूप छान दाखवले आहे.
ती आनंदला जेंव्हा नमस्कार करते तेव्हा आनंद एकदम व्यथित होऊन ‘तुझे क्या आशीर्वाद दू बेहेन, ये भी तो नही कह सकता की मेरी उमर तुझे लग जाये’ या संवादातून ट्युमर सारख्या जीवघेण्या आजारातून आपण काही वाचणार नाही हे वास्तव कायम उराशी बाळगून असतो. मृत्युची सावली कायम आनंदच्या मागे असते हे चित्रपट पाहताना मन हेलावून जातं..
कलकत्त्यावरून आलेला आनंद हा अनाथ असतो. त्याची एक प्रेयसी असते पण तिचं लग्न दुसऱ्याशी होतं. हा प्रेमभंग झालेला असूनही हसरे दुःख हृदयात साठवून सगळीकडे आनंदाने वावरत असतो. अशाच एका संध्याकाळी भास्करच्या घरात ‘मैने तेरे लिये सात रंग के सपने चुने..’ हे गीत गात असतो तेंव्हा भास्करला आनंदचे प्रेमभंगाचे दुःख जाणवते पण साऱ्या दुनियेला फक्त आनंद आणि आनंदच वाटणारा हा आनंद आपल्या दु:खाचा पठ्ठ्या शेवटपर्यंत भास्कर काय कुणाला ही थांगपत्ता लागू देत नाही .
‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणे सदैव आनंदात वावरणारा हा आनंद रस्त्यात कोणी जरी भेटले तरी ओळख काढून घेण्याच्या निमित्ताने ‘मुरारीलाल’ म्हणून हाक मारत असतो. असाच एकदा जॉनी वॉकर यांनाही मुरालीलाल म्हणून हाक मारतो, तो रंगभूमीवरचा नट असतो.
हा मुरालीलाल त्याला नाटकातही घेतो, तोही आनंदमध्ये इतका गुंततो की जेव्हा आनंद अंतिम समयी अंथरुणाला खिळलेला असतो तेव्हा जॉनी वॉकर त्याला भेटायला येतो आणि म्हणतो ‘इतनी जल्दी परदा नही गिरने दूंगा’ म्हणून बाहेर येऊन बसून रडतो तेव्हा काळजात अक्षरशः तुटत..
एका अज्ञाताच्या प्रदेशातून आलेला हा आनंद सर्वांना जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधात गुंतवून जातो. आनंदचा झालेला मृत्यू व त्यांचे केलेले रेकॉर्डिंग, त्यातून आलेला आवाज ‘बाबुमोशाय’ ही हाक हे सार काळीज पिळवटून टाकणारे होते. इथे चित्रपट संपतो परंतु संवेदनशील आणि कल्पक ऋषिकेश मुखर्जी यांनी शेवटी ‘आनंद मरा नही, आनंद मरते नही…अशा सूचक ओळींचा फलक आपल्यासमोर ठेवतात.
या चित्रपटाचे दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा साधी माणसं, साधी घरं आणि ह्याच साधेपणाने आनंद या सिनेमाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले… या चित्रपटातील सहकलाकार जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी ह्रषीदांची एक आठवण सांगितली आहे की या चित्रपटाची बोलणी करण्यास ह्रषीदा सीमा ताईंच्या घरी आले ते तेव्हा रमेश देव सीमा देव हे सहाजिकच आपापसात मराठीत बोलत होते. हे त्यांनी अचूक हेरले आणि चित्रपटात देखील या दोघांनी अधून मधून मराठी बोलावे असा अचूक सल्ला दिला आणि तो परिणामकारक ठरला.
या चित्रपटातील गाणी देखील खूप लोकप्रिय झाली ‘मैने तेरे लिये सात रंग के, जिंदगी कैसी है पहेली, ना जिया जाये ना, कही दूर जब दिन ढल जाये यासारखी अर्थपूर्ण शब्दांची गाणी चित्रपटाच्या कथानकाच्या प्रसंगाला यथार्थ पेरली आहेत.
महान संगीतकार सलील चौधरी यांनी अतिशय सुंदर गाणी रचली आहेत. प्रसिद्ध गीतकार कवी लेखक गुलजारजींचे भावपूर्ण संवाद या चित्रपटाला चार चाँद लावून जातात. या चित्रपटातील संवादांमध्ये कुठे मेलोड्रामा जाणवत नाही. वरवर पाहता मोकळा आनंदी विनोदी स्वभावाचा आनंद आतून निश्चल, तत्वज्ञानी ,कर्मयोगी वृत्तीचा वाटतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही ‘हे गुलजारजी सहज लिहून जातात आनंद मोकळे पणाने,चांगुलपणाने जगताना दाखवला आहे.
कुणालाही आपण त्रास देऊ नये व आपल्या सहवासात आलेल्या सर्वांना आनंद भरभरून वाटावा हे तत्वज्ञान उराशी बाळगणारा आनंद खूप काही शिकवून जातो. एकीकडे दुर्धर कर्करोगाच्या मरणयातना हसतमुखाने स्वीकारणारा आनंद हा असामान्यच वाटतो. ‘जिंदगी और मौत उपरवाले के हात मे है जहापन्हा, इसे ना तुम बदल सकते हो ना मै ..’हे आयुष्याचे कटु पण शाश्वत सत्य आनंद जाता जाता सांगून जातो. गुलजार दैवी लेखणीने या चित्रपटातील संवादाला एक भावनिक चिरंतन मूल्यांची झालर लाभली आहे. यातील संवाद रसिकांच्या मनात कायम घर करून बसले आहेत.
‘आनंद ‘या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. उत्तम निर्माता म्हणून सिप्पी यांना तर उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ह्रषीदांना, उत्कृष्ट संवादलेखक म्हणून गुलजारजींना व उत्कृष्ट अभिनेता म्हणून राजेश खन्ना तर उत्कृष्ट सहकलाकार म्हणून अमिताभ बच्चन या सर्व दिग्गज मंडळींना पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अनेक युगातूनअशी सर्वार्थाने परिपूर्ण लोकप्रिय चित्रपट कलाकृती जन्माला येते,असे सिनेप्रेमी म्हणून मला वाटते
हा ‘आनंद’ चित्रपट तुम्ही रसिकजनांनी पूर्वी अनेकदा पाहिला असेलच परंतु परत पाहताना तो अनुभवा…. ‘आनंद’ सारखा हटके चित्रपट केला यासाठी दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी, मुख्य अभिनेता राजेश खन्ना आणि सर्व मान्यवर कलाकारांच्या आम्ही चित्रपट प्रेमी कायमचे ऋणात राहणेच पसंत करू. अशा या अजरामर कलाकृतीला एक चित्रपट रसिक म्हणून माझा मानाचा मुजरा