ठाणे – पंधरा वर्षांपुर्वीच मुंबईतील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले असते तर आज 3500 कोटी रूपये वाचले असते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे. मुंबई महापालिकेतील निधीचा विद्यमान सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप ठाकरे सरकारने केला असून त्याच्या विरोधात अदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ठाकरे गटाने 1 जुलैला मोर्चा आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
आज ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आमच्या सरकारने मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे दूर करण्याचाच नव्हे तर संपुर्ण रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन तीन वर्षात हे काम होईल असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात आम्ही 450 किमीच्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणार आहोत त्यासाठी सहा हजार कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. असाच प्रकल्प ठाण्यातही राबवण्यात येईल. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, कोविडच्या नावाखाली कोणी घरात बसून राहणे योग्य नव्हते.
आमच्या सरकारने आता सर्व प्रकारची कामे हातात घेतली आहेत. जी 20 च्या नावाखाली मुंबईत पैशाची उधळण करण्यात आली आणि रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा देखावा करण्यात आला अशी टीका ठाकरे गटाने केली होती. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, जी 20 साठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना मग काय मुंबईतील झोपडपट्ट्या दाखवायच्या होत्या काय.अशा परिषदांवर खर्च करणे आवश्यकच असते आमच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे असे ते म्हणाले. आताही मुंबईतल्या ज्या विविध प्रकल्पांवर खर्च केला जात आहे त्यातून लोकांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. शिवडी ते न्हावा शेवा या 22 किमी लांबीच्या प्रकल्पामुळे नागरीकांना लागणारा दोन तासांचा वेळ केवळ 15-20 मिनीटात पुर्ण होणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्याच्या काळात मुंबई महापालिकेच्या ठेवी वाढल्या असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की आम्ही सत्तेवर येण्या आधी मुंबई महापालिकेच्या ठेवी 77 हजार कोटी रूपये होत्या त्या आता 88 हजार कोटी रूपये इतक्या झाल्या आहेत.