मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आदित्य ठाकरे यांच्या निटकवर्तीयांवर टाकलेल्या छापेमारीवरून राज्याचे राजकारण तापले आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी केंद्र व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत सत्ता बदल झाल्यानंतर जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
देशात सूडाचे राजकारण सुरू आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मोदी सरकारने एक खूप चांगले काम केले आहे. जे काही भ्रष्टाचारी लोक होते, ज्यांच्या ईडी व सीबीआय चौकशा सुरू होत्या, त्या सर्वांना भाजपने दबाव टाकून आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतले.
आता हे सर्वजण भाजपचे नेते म्हणून एकत्र आलेत. उद्या कॉंग्रेस नेते देशाचे पंतप्रधान झाले तर या सर्वांना तुरुंगात डांबणे आम्हाला सोपे होईल, असे पटोले भाजपला इशारा देत म्हणाले आहेत.
आता निवडणुकांची वेळ जवळ येत आहे. त्यामुळे विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काहीच नाविन्य नाही. विरोधी पक्ष तपास यंत्रणांच्या दबावाला भीक घालणार नाहीत. भाजपला सत्तेतून बेदखल करणे हाच विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. देश व संविधानाच्या संरक्षणासाठी भाजपला सत्तेतून पायऊतार करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असेही पटोले म्हणाले.
75 रु. किलोची सुतळी 550 रुपयांना
आगामी निवडणुकांत जनताच भाजपला घरी बसवेल. सरकार शेतमालाची खरेदी करते. त्याला सुतळी लागते. ती बाजारात अवघ्या 75 रुपयांना किलो मिळते. याऊलट सरकार हीच सुतळी 550 रुपये किलो दराने विकत घेते. या पद्धतीने हे सरकार कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे, असे पटोले म्हणाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विक्रमी भ्रष्टाचार झाल्याचा दावाही पटोले यांनी यावेळी केला.