भिगवण – ठराविक कालावधीने सातत्याने रुग्ण आढळत असल्याने भिगवण परिसर करोनाच्या चक्रव्यूव्हात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. आज येथील एक महिला डॉक्टर व त्यांचा मुलगा, अशा दोघांना लागण झाली आहे. भिगवण स्टेशन येथे 15 दिवसांपूर्वी रुग्ण आढळला. त्यानंतर करोनाची साखळी सुरुच राहिली आहे. भिगवण स्टेशन येथील महिलेनंतर सलून व्यावसायिक, थोरातनगर येथील व्यावसायिक व आता महिला डॉक्टर व मुलगा पॉझिटिव्ह आल्यामुळे भिगवणचा धोका वाढला आहे.
भिगवण येथे (दि.28) एप्रिलला पहिला रुग्ण आढळला. परंतु रुग्णांच्या मृत्यूनंतर व संपर्कातील नातेवाइकांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे करोनाची साखळी तुटली होती. त्यानंतर अडीच महिने भिगवणकरांनी करोनाला रोखून धरले होते. परंतु त्यानंतर (दि.8) पुन्हा भिगवण स्टेशन येथील एका 40 वर्षीय महिलेला लागण झाली होती. ही साखळी तोडण्यासाठी भिगवणकरांनी प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर महिलेच्या संपर्कातील चार, स्टेशन येथील सलून व्यावसायिक पॉझिटिव्ह आढळून आला. सलून व्यावसायिकांच्या संपर्कातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
थोरातनगर येथील व्यावसायिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली. परंतु त्यांच्या संपर्कातील 38 जणांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर हायसे वाटू लागल्यानंतर पुन्हा मायलेक पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोघांची बारामती येथे (दि. 25) चाचणी केली होती. आजपर्यंत तीन करून पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सबंधित महिला डॉक्टरांच्या संपर्कातील 5 जणांची चाचणी केली असून, त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. इंदापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी भिगवणला भेट देऊन आढावा घेतला. प्रभाग क्रमांक एकचा काही भाग सील केला आहे.
टाळेबंदी शिथिलतेची व्यावसायिकांकडून मागणी
भिगवण परिसर (दि.16) पासून बंद आहे. सर्व व्यवहार ठप्प आहे, अशा परिस्थितीत हातावर पोट असलेला गरीब, व्यापाऱ्यांची स्थिती बिघडली आहे. त्यामुळे टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. भिगवण येथे ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही इमारत पडून आहे.
याठिकाणी भिगवण परिसरातील रुग्णांची आवश्यकता म्हणून कोविड केअर सेंटरची मागणी केली जात आहे. पश्चिम भागासाठी भिगवण येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे, ज्या माध्यमातून रुग्णांना तपासणीसाठी इंदापूर, बारामती किंवा पुणे येथे जाण्याची गरज पडू नये. नव्याने बांधलेल्या इमारतीत त्यांची सोय करता येईल. याबाबत जिल्हा परिषद आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.