नवी दिल्ली – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन म्हणजे बीपीसीएलने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रात ही भारतातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. तर रिटेल विक्री क्षेत्रात दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
या कंपनीचे खासगीकरण करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना खासगी कंपनीच्या नियंत्रणाखाली काम करायचे नाही, अशा कर्मचाऱ्यांना सेवेतून बाहेर पडता यावे याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी सुरू करण्यात आलेली ही योजना 13 ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. या कंपनीत सरकारचे 52.98 टक्के भांडवल आहे. या कंपनीत 20 हजार कर्मचारी आहेत.
45 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दहा टक्के कर्मचारी या योजनेचा लाभ घेतील असे कंपनीच्या व्यवस्थापनाला वाटते. त्या कंपनीचे भागभांडवल घेण्यासाठी सरकारने जारी केलेल्या निविदाची अंतिम तारीख 31 जुलै आहे. सेवा केलेल्या प्रत्येक वर्षासाठी दोन महिन्यांचा पगार किंवा शेवटच्या महिन्यातील पगार गुणिले सेवेचे उरलेले महिने असा पर्याय देण्यात आलेला आहे. कंपनीचे बाजार मूल्य 97,247 कोटी रुपये असून यात सरकारचा वाटा 51,500 कोटींचा आहे.