भोपाळ – मध्य प्रदेश पोलिसांच्या अत्यंत गलथानपणाचा एक लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. एका प्रकरणात पोलिसांनी एका मुलीच्या बेपत्ता होण्याबाबत तिच्या पित्याला आणि भावालाच शिक्षा करवली. मात्र 9 वर्षांनी ही मुलगीच जिवंत परतली असल्यामुळे सगळेच चक्रावले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांच्या बेपर्वा कारवाईबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी ज्या मुलीला मृत ठरवले होते ती जिवंतच कशी झाली अशी प्रश्नांची सरबत्तीही आता सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील सिंगोडी नामक गावातील ही घटना आहे. पोलीस दप्तरी ज्या मुलीची हत्या करण्यात आली होती तिचे नाव कांचन असे असल्याचे म्हटले आहे. ती कांचन तिच्या हत्येनंतर नऊ वर्षांनी आता घरी परतली आहे व आता तिचे लग्नही झाले आहे.
13 जून 2014 रोजी कांचन राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी तिचा बराच शोध घेतला. ती न सापडल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरू केला. दोन वर्षांपूर्वी पोलिसांना कांचन राहत होती त्याच भागात एक मानवी हाडांचा सापळा सापडला. ही कांचनच असून तिच्या पित्याने आणि भावानेच तिची हत्या केली व तिचा मृतदेह शेजारच्या शेतात पुरल्याचे पोलिसांनी सिध्दही करून टाकले.
दरम्यान, जो सापळा कांचनचा असल्याचा दावा पोलीस करत आहेत ते प्रत्यक्षात आमच्या एका नातलगाचा आहे असे कांचनचे कुटुंबीया वारंवार सांगत होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. उलट आम्हीच कांचनची हत्या केल्याची कबुली द्या म्हणून तिच्या पित्यावर आणि भावावर दबाव आणल्याचा आरोप आता केला जातो आहे.
कांचनच्या भावाची एका महिन्यापूर्वी जामीनावर सुटका झाली आहे. मात्र तिचा पिता अजुनही तुरूंगात आहे. दरम्यानच्या काळात कांचनचे लग्नही झाले आणि तिला दोन मुलेही झाली. माहेरी आल्यावर जेव्हा तिला पिता आणि भावाबद्दल समजले तेव्हा तिने लगेचच पोलीसांत धाव घेतली.