नारायणडोहो ,(वार्ताहर) – रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव वेगात आलेली ईरटीगा कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कार चालक ठार झाल्याची घटना नगर – सोलापूर महामार्गावर साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेल समोर सोमवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.
मैनुद्दीन कलंदर शेख (वय ४५, रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड) असे मयताचे नाव आहे. मयत शेख हे त्यांची ईरटीगा कार (.एम एच १६ सी वाय ८९४३) घेऊन नगरहून सोलापूर महामार्गाने सोमवारी पहाटे कोयाळ गावाकडे जात असताना साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेल समोर रस्त्यात एक कंटेनर उभा होता.
कार वेगात असल्याने त्यांना कंटेनरचा अंदाज न आल्याने कार पाठीमागून जोरात कंटेनरवर आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर होऊन चालक शेख हे गंभीररित्या जखमी झाले. अपघाताचा आवाज आल्याने आजू बाजूचे नागरिक जमा झाले. त्यांचे चुलत भाऊ शब्बीर अब्दुल शेख हे ही ते आले. त्यांनी जखमी शेख यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ते मयत झाले होते.