यवत, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील यवत येथील खुपटेवस्ती आणि माणकोबावाडा येथे उन्हाळा सुरु होण्यापूर्वीचा पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली असल्याने नागरिकांनी टँकर सुरू करण्याची मागणी यवत ग्रामपंचायत कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
खुपटेवस्ती येथील ग्रामपंचायत यवतच्या विहिरीवरून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, उन्हाळा अजून सुरु होण्याच्या आधीच येथील ग्रामपंचायतच्या विहिरीमधील पाण्याने तळ गाठला आहे. नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना डोक्यावर हंडा घेऊन यावर्षी पाण्याच्या शोधात भटकावे लागणार आहे.
यवत गावातून उजवा खडकवासला कालवा गेला आहे. कालव्यातून सोडले जाणारे उन्हाळी आवर्तनामुळे गावातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात देखील कमी प्रमाणात पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असे. अशीच परिस्थिती काही वाड्या वास्त्यांनावरील देखील होती. मात्र कालव्याच्या अस्तरीकरणामुळे कालव्यातून होणारा पाझर हा पूर्णपणे बंद झाला आहे.
उन्हाळ्याच्या सुरवातीसच गावातील विहिरी, कुपनलिकांची पाणी पातळी खालावली गेली आहे. अस्तरीकारणामुळे नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मात्र हवेली तालुक्यातील नागरिकांनी अस्तरीकरणाला विरोध केला असल्याने काम बंद पाडण्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर यश आले होते. मात्र हेच काम यवत हद्दीत झाल्याने नागरिकांना मात्र याची आता मोठी किंमत चुकवावी लागत आहे. टँकर सुरू करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नसल्याचे नागरिक बोलत आहेत.
खुपटेवस्ती, माणकोबावाडा येथील ग्रामपंचायतीची असणाऱ्या विहिरीला मूळचे पाणी हे कमी आहे. मागील काही दिवसापूर्वी पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याच्या पाझर विहारित उतरला असल्याने नागरिकांना काही काळ का होईना त्यांची पाण्याची फरफट दूर झाली होती. मात्र आता पुन्हा उन्ह्याळ्याची चाहूल लागली असून आत्ताच विहिरीने तळ घातला असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे लेखी पत्रद्वारे पाण्याच्या टँकर चालू करण्याची मागणी केली आहे.
तहसीलदार, बीडीओंकडून पाहणी
यवत, खुपटेवस्ती येथील नागरिकांनी लेखी पत्राद्वारे ग्रामपंचायत कार्यलयाकडे टँकर चालू करण्याची मागणी केली होती. यावेळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार आणि गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यासह विस्तार अधिकारी मुलाणी, पाणीपुरवठा अभियंता योगेश दिवेकर, यवत ग्रामपंचायतचे सरपंच समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम, नागरिकांनी खुपटेवस्ती ग्रामपंचायतीच्या मालकीची विविरीची पाहणी करण्यात आली असून नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य लता लक्ष्मण कोळपे यांनी दिली.