राजगुरूनगर/मंचर – शेतकर्यांना वार्यावर सोडणार्या केंद्र आणि राज्य सरकार विरोधात बुधवार (दि.27) ते शनिवार (दि. 30) या कालावधीत महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती खेड तालुक्याच्या वतीने युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅड. देविदास युवराज शिंदे पाटील, तर आंबेगावच्या वतीने पुणे जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, शिवसेनेचे (ठाकरे गट)चे अध्यक्ष सुरेश भोर यांनी दिली.
कांद्यावरील निर्यात बंदी, दुधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी केली असताना या दोघांनाही निलंबित करण्यात आले. आताही लढाई रस्त्यावर लढण्याचा इशारा डॉ. कोल्हे यांनी दिला आहे त्यानुसार महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा बुधवारी (दि. 27) शिवनेरी जुन्नर येथून सुरू होणार असून ओतूर-आळेफाटा-नारायणगाव-कळंब-मंचर-राजगुरूनगर येथे येणार आहे.
राजगुरूनगर येथे सायंकाळी सात वाजता मार्केट यार्ड, चाकण येथे साडेआठ वाजता मशाल शेतकरी आक्रोश मोर्चा होणार आहे. त्यानंतर केंदूर येथे पहिला मुक्काम दुसर्या दिवशी शिक्रापूर मांडवगण निवरी मार्गे दौंड येथे मुक्कामी तर शुक्रवारी (दि. 29) दौंड येथून इंदापूर मार्गे बारामती येथे जाणार आहे. बारामतीत मशाल मोर्चा काढून सत्ताधार्या विरोधात शेतकर्यांचा आक्रोश व्यक्त केला जाईल. शनिवारी (दि. 30) बारामती येथून उरुळी कांचन मार्गे कुंजीरवाडी हडपसर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी तीन वाजता सांगता सभा होणार आहे.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, हा मोर्चा कळंब (ता. आंबेगाव) येथे मोर्चा 3 वाजता येणार आहे व त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता मंचर येथे पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.