नवी दिल्ली- देशात नव्याने लागू करण्यात अलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण केले. त्यानिमित्त देशभर शेतकरी संघटनांनी काळा दिवस पाळला. पंजाब, हरियाणा आणि राजधानी सीमांवर अनेक गावांमध्ये आंदोलन करण्यात आले.
लुधियाना जिल्ह्यातील शिदवान कलान येथे या लढ्याचे नेतृत्व महिलांनी केले. त्यांनी “आम्ही लढू; आम्ही जिंकू’ अशा घोषणा दिल्या. अमृतसर जिल्ह्यातील तूर येथे शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन मोर्चा काढला. पंजाबमधील बहुतांश गावांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी आपण आजचा दिवस पाळत आहोत.
आपण आणि आपल्या कुटुंबीयांसाठी तुम्ही आपला विरोध नोंदवा. आपली वाहने आणि घरांवर काळे झेंडे लावा आणि पंतप्रधानांच्या प्रतिमेचे दहन करा. ही आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे, असे आवाहन करणारा व्हिडिओ हरियाणा भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनामसिंग चुदानी यांनी प्रसारीत केला.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार करून आम्ही शक्तिप्रदर्शन करणार नाही. मात्र आम्ही प्रतीकात्मक निदर्शने करू. त्यात करोनाच्या आचारसंहितेचे पालन करू. आम्हाला या प्रश्नावर तोडगा काढायचा आहे. मात्र, सरकारने व्यवहार्य तोडगा घेऊन समोर आले पाहिजे, असे संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी सांगितले.
अनेक विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या या “काळा दिन’ला गेल्या आठवड्यातच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांशी त्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू करून त्यात सर्वमान्य तोडगा काढण्याची विनंती करणारे पत्र विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी आपल्या निवासस्थानावर काळा झेंडा फडकावला. ते म्हणाले, मी केंद्राला पुन्हा विनंती करतो, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्याचा सहानुभुतीने विचार करावा. माझ्यासारखेच अकाली दलाचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरावर काळे झेंडे लावतील आणि काळा दिवस पाळतील.
दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमांवर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी 26 नोव्हेंबरपासून निदर्शने करत आहेत. केंद्र सरकारने त्यांच्याशी सुरू असणारी चर्चा 22 जानेवारीपासून थांबवली आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनात समाजातील अन्य घटकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.