पवन मावळ परिसरातील प्रकार; शेतकऱ्यांमध्ये संताप
उर्से – अगोदरच ओला आणि कोरड्या दुष्काळाच्या छायेत अडकलेल्या पवन मावळातील शेतकऱ्यांपुढे नविनच संकट उभे ठाकले आहे. जानेवारी महिना सुरू झाला असला तरी अद्यापपर्यंत या परिसरातील ऊस तोडणीला साखर कारखान्यांनी सुरुवात न केल्यामुळे ऊसाच्या पिकाचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून ऊसतोडणी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पवन मावळात तांदळाच्या पिकाबरोबरच ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. संत तुकारास सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी नोव्हेंबरपासूनच या परिसरातील उसाची तोडणी करून कारखान्याला ऊस नेला जातो. यावर्षी मात्र जानेवारी महिना सुरू झाला तरी अद्यापपर्यंत पवन मावळातील ऊसतोड सुरू झालेली नाही.
ऊसतोडणीला उशीर होऊ लागल्यामुळे उसाला तुरे लागले आहेत. उसाचे वय वाढत चालल्यामुळे उसाचे वजन कमी होत चालले आहे. या वर्षी पाऊस चांगला पडून व पिक चांगले येवून सुद्धा वेळेत तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
उसतोडणी होत नसेल तर पुढील वर्षी उस पिक घ्यायचे की नाही? याबाबत विचार करण्याची वेळ आली असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक हे शेतकऱ्यांना वेळेवर उसतोडणी करण्याचे फक्त आश्वासन देत आहेत परंतु याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष धामणकर यांनी सांगितले. याबाबत संत तुकारास सहकारी साखर कारखान्याला निवेदन देण्यात आले आहे.
पवन मावळातील उसतोडणी लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी मधुकर सावंत, बाळासाहेब धामणकर, सोपान गायकवाड, रामदास वाळूंज, बाळासाहेब पिसाळ, अर्जुन कारके, शंकर धामणकर, बाळासाहेब बराटे यांनी कारखान्याच्या संचालकांना निवेदन दिले आहे.