केंदूर (पुणे) – केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. केंद्राच्या या निर्णयावर शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. निर्याबंदी लागू केल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात किंटलमागे 500 ते 600 रुपयांची घसरण झाली आहे. केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळी बाजारपेठ अभावी खराब झाल्या. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कांद्याच्या रोपवाटिका नष्ट झाल्या आहेत.
दरम्यानच्या काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा लागवड केली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनात भविष्याच्या बाजारभावाची धास्ती भरलेली आहे. असमानी संकटात सापडलेला शेतकरी आता आणखी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आणि सरकारच्या अशा शेतकरी धोरणामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला जाणार असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे.