खेड शिवापूर – लॉकडाऊनच्या काळात हतबल झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणने जबरदस्त शॉक दिला असून, खेड शिवापूर परिसरातील शेतकरी व नागरिक या धक्क्याने पूर्णपणे हतबल झाला आहे.
मार्च महिन्यानंतर जूनपर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार ठप्प होते. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर कोणत्याही प्रकारची कामे बंद होती. यामध्ये शेतकरीसुद्धा सहभागी असल्याने गेल्या तीन महिन्यात पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी कवडीमोल भावाने शेतातील भाजीपाला द्यावा लागल्याने शेतीच्या कामात गुंतवलेले भांडवलसुद्धा मिळाले नाही. आता त्यात भर अवाढव्य वीज बिलाची भर पडली आहे.
महिन्याला 400 ते 450 रुपये वीज बिल येणाऱ्या नागरिकांना तीन महिन्याचे 2400 ते 2500 वीज बिल आले आहे, तर महिन्याला 1000 ते 1200 रुपये बिल येणाऱ्या ग्राहकांना तब्बल 11 हजार रुपये वीजबिल आले आहे, त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिक यामध्ये पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या भरडला जाणार हे निश्चित!