दुर्गम भागात आपत्कालीन मदतकार्य वाऱ्यावर
खडकवासला : रायगड जिल्ह्यालगत असलेल्या पानशेत धरण खोऱ्यातील अतिदुर्गम पोळे येथील रानात सरपण आणण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचा अचानक लागलेल्या भीषण वणव्यांत होरपळून जागीच दुर्दैवी मुत्यू झाला. तुकाराम भाऊ निवंगुणे( वय ६५ ,रा.पोळे, ता.वेल्हे ) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.
हि दुर्घटना आज शुक्रवारी ( दि.३) घडली. वणव्यांत होरपळल्याने तुकाराम यांच्या शरिराचा अक्षरशः कोळसा झाला होता. ते मदतीसाठी जोरजोराने आक्रोश करत होते. त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थ रानात गेले. राज्यात अत्यंत मागासलेल्या वेल्हे तालुक्यातील आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर मदतकार्य पोहचण्यास रस्ते, आरोग्य सेवेअभावी अडचणी निर्माण होत आहेत. हे आजच्या दुर्घटनेवरून पुन्हा अधोरेखित केले आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकां पाठवली. स्थानिक कार्यकर्ते अनंता पोळेकर व ग्रामस्थांनी तुकाराम यांना उपचारासाठी वेल्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र ते उपचारा पुर्वी मयत झाले होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर हिरास, डॉ. डी.बी.भोईटे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. भीषण आगीत तुकाराम यांच्या शरिराचा अक्षरशः कोळसा झाल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाल्याचे डाँक्टरांनी सांगितले. या प्रकरणी वेल्हे पोलीस अधिक तपास करत आहेत. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी घटनेचे गांभीर्य पाहून सखोल चौकशी सुरू केली आहे.