शिर्डी – साईंच्या शिर्डीत देश-विदेशातून येणारे अनेक भाविक हे अन्नदान, हॉस्पिटलमध्ये साहित्य, औषधे, शैक्षणिक साहित्यासाठी लाखो रुपयांची देणगी देतात. परंतु खास करून हॉस्पिटलसाठी दिलेल्या देणगीचा उपयोग नक्की कुठे आणि कसा होतो, हा प्रश्न भाविकांना पडला आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची देणगी साई संस्थांनच्या तिजोरीत जमा होते, मात्र मोफत उपचाराचा फार्स फक्त नावालाच असून इमर्जन्सी लागणाऱ्या औषधांचा साठा उपलब्ध का नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्यावेळी एखादा पेशंट हार्ट अटॅक आल्यावर इमर्जन्सीच्या नावाखाली दाखल केला जातो, त्यावेळी त्याला 22 हजार रुपयांचे इंजेक्शन बाहेरून आणण्याची सक्ती केली जाते. अनेकांकडे इतकी मोठी रक्कम ऐनवेळी जवळ नसते. परिणामी इंजेक्शन वेळेवर न मिळाल्याने अनेक रुग्णांना जगाचा निरोप घ्यावा लागतो. काही डॉक्टर्स व स्टाफ ठराविक मेडिकलमधून औषधे आणण्याचा सल्ला देतात तर अनेक एजंट अशा संकटाच्या परिस्थितीचा फायदा घेतात. अर्थात संस्थान परिसरात मित्रसेन नावाचे मेडिकल असून तेथील औषधांच्या किंमतीत व इतर मेडिकलच्या किमतीत मोठी तफावत आहे.
ना नफा ! ना तोटा या नावाखाली गोरगरीब जनतेची सर्रासपणे फसवणूक करत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. अर्थात या गंभीर गोष्टींना जबाबदार असणारे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. मेडिकल स्टाफच्या समस्या, डॉक्टरांच्या समस्या, अत्याधुनिक साधन सामुग्री, ब्लड बॅंकेतील रक्ताचा तुटवडा, औषधे, स्टाफरुम्स, रुग्णांच्या रूम्सच्या समस्या, पार्किंग, सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्हीसह अनेक समस्यांचा डोंगर वाढतच आहे. डॉ. शैलेश ओक यांनी वर्षभरात एकही समस्या सोडविली नसल्याने नेमकी ते कोणते काम करतात आणि लाखोंचा पगार कसा घेतात, हे कोड मात्र न उलगडणार आहे.
साई संस्थान प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने गोरगरीब रुग्णांची हेळसांड थांबण्याचे नाव घेत नाही. विशेष बाब म्हणजे साईबाबा सुपर हॉस्पिटल व साईनाथ हॉस्पिटल येथील डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ सारखे काम करूनही वेतनाची तफावाची दरी खूप मोठी आहे. तर दुसरीकडे कंत्राटी कामगार दिवसरात्रं काम करूनही तुटपुंज्या वेतनाचा अन्याय सहन करत आहे. वास्तविक रुग्णालय हा संवेदनशील विभाग असून याकडे गांभीर्याने बघण्याची जबाबदारी कोविडच्या काळात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेली असताना देखील राज्यात सर्वात श्रीमंत असणाऱ्या साई संस्थान प्रशासनाकडून सर्व नियमांची पायमल्ली होत आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
अनेक स्टाफ हा आयसीयू व इतर ठिकाणी मोबाईलमध्ये मग्न असतो. अनेकजण काम न करता फक्त बसून पगार घेतात. डॉक्टर्स कधीही वेळेवर उपलब्ध नसतात तर आपत्कालीन परिस्थितीतही तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसतात. यावर नियंत्रण ठेवणारे वैद्यकीय संचालक डॉ.शैलेश ओक हे फक्त काही तासच येतात तर अनेकवेळा सुट्टीवरच असतात. त्यामुळे दोनही हॉस्पिटल साईभरोसे सुरू आहे, असे रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब काटकर म्हणाले.