आईवडिलांबरोबर, कुटुंबात राहणाऱ्या मुलांचा सहभाग बाल गुन्हेगारीत वाढत असल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. याचे नेमके कारण काय? त्यावर काही उपाय आहेत का? मार्ग कसा काढता येईल? या अनुषंगाने केलेली चर्चा…
मुले घरापासून दूर असली, की बिघडतात. चुकीच्या मार्गाला लागतात, यावर आपला ठाम विश्वास असतो. बोलताना सहजपणे आपण तसे बोलून जातो. पण खरेच अशी परिस्थिती आहे का? राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार तरी यात आता फारसे तथ्य राहिलेले नाही. काही ठिकाणी अशी परिस्थिती असेलही, पण राज्यातील बालगुन्हेगारांचा अभ्यास केला तर आईवडील व कुटुंबाबरोबर राहणारी मुले आता गुन्हेगारीकडे अधिक वळत असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्रात बालगुन्हेगारांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास केल्यावर ही बाब समोर आल्याचे या अहवालात म्हटले आहे. बालगुन्हेगारांकडून घडलेले गुन्हे व त्यातील आरोपींचा अभ्यास केल्यावर सर्वाधिक बाल गुन्हेगार हे आईवडील व कुटुंबासह राहत असताना गुन्हे करताना दिसतात. आतापर्यंत जे मानले जात होते, की बेघर, निराधार मुलांकडून प्रामुख्याने गुन्हे घडतात, त्या समजाला इथे छेद बसतो. ते प्रमाण अतिशय नगण्य आहे. या संदर्भातील आकडेवारीवरूनच ही बाब स्पष्ट होते. 2019 मध्ये 18 वर्षांखालील बाल गुन्हेगारांकडून राज्यात 5 हजार 189 गुन्हे घडले. या गुन्ह्यांमध्ये 6 हजार 454 बाल गुन्हेगार आरोपी आहेत. त्यापैकी 5 हजार 834 बाल गुन्हेगार आपल्या आईवडिलांबरोबर, तर 416 बाल गुन्हेगार पालक असलेल्या नातेवाईकांकडे राहत होते. ज्यांच्याकडून गुन्हे घडले आहेत, अशी केवळ 204 बेघर, निराधार मुले या अपराधांत आहेत.
बाल गुन्हेगारीत नेमके कोण आहे, त्याचे प्रमाण काय आहे वगैरे गोष्टी या लेखाचा मूळ उद्देशच नाही. कारण बाल गुन्हेगारीच काय, एकुणातच गुन्हेगारी वाईट आहे, त्यामुळे त्यात कोणाचा सहभाग आहे हा मुद्दा तसा गौण राहतो. अलीकडचा हा बदललेला ट्रेंड आहे, या एकाच गोष्टीसाठी बालगुन्हेगारीत आता आईवडील, कुटुंबासह राहणारी मुलेही सहभागी होत असल्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. याचे मुख्य आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, गुन्हेगारीचे बदललेले स्वरूप हे आहे. पूर्वीची गुन्हेगारी वेगळी होती. दरोडा, चोऱ्या, मारामाऱ्या, पाकिटमारी, खून असे साधारण त्याचे स्वरूप होते. त्यात आजही फारसा फरक झालेला नसला, तरी त्याच्या जोडीला आज सायबर क्राइम्स वाढू लागले आहेत. त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. शिक्षण नसलेली, कमी शिक्षण असलेली किंवा वाममार्गाला लागलेली मुले पूर्वी प्रामुख्याने गुन्हेगारीत असायची, आता परिस्थितीच बदलली आहे. आता संपन्न घरातील मुलेही या क्षेत्रात दिसू लागली आहेत. त्याची मुख्य कारणे वाढलेल्या किंवा वाढवलेल्या गरजा, चैनीचे बदललेले निकष, बदललेल्या अपेक्षा, सहजसुलभ झालेला “इझी मनी’चा पर्याय अशी साधारण आहेत
पूर्वीही कारणे साधारण हीच होती. इझी मनी कोणाला नको? पण आता हे आकर्षण घरोघरी पोचले आहे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. “चूक’ ही कधी “घडते’ कधी “मुद्दाम घडवली’ जाते. जेव्हा परिस्थिती वाईट असते, संगत चुकीची असते तिथे गोष्टी वाईट घडवल्या जाऊ शकतात. पण आता काही मिळवण्याची ही भूक मध्यमवर्गीय, सुखवस्तू कुटुंबातही थेट दिसू लागली आहे. त्यात समोर खूप आकर्षणे आहेत. या सगळ्या गोष्टी मिळवायच्या तर पैसे लागणार, हे लहान वयातच समजू लागले आहे. मग त्या अनुषंगाने आईवडिलांना धमकावले जाते. ब्लॅकमेल केले जाते. अगदी सरसकट नसली, तरी अनेक ठिकाणी ही सवय होऊ लागली आहे,’ असे मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट यांनी सांगितले.
याचे कारण सांगताना डॉ. बापट म्हणतात, “यात त्यांना प्लेजर- आनंद वाटतो. पण हा आनंद तात्कालिक असतो हे या मुलांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे असे आनंद मिळवण्याचा ते सतत प्रयत्न करत राहतात. त्यातून चुकीच्या मार्गाकडे वळतात. यामध्ये ते घरी राहतात, की एकटे राहतात हा भाग खूप कमी आहे; त्यांना स्ट्रेस बस्टर म्हणून या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. एकीकडे प्रलोभने वाढली आहेत, आईवडिलांचेही ताण वाढले आहेत. त्यातून समतोल साधण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. अगदी घराघराची ही कथा नसली, तरी हे प्रमाण वाढते आहे, हे नक्की.’ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पल्लवी मोहाडीकर कासंडे म्हणतात, “आज गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. घरातील मुलांना स्क्रीनचे व्यसन लागले आहे. सायबर क्राइम्सचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग करणे यासाठी ते ज्ञान असणे आवश्यक असते. तिथे तज्ज्ञच लागतात. इझी मनीचा विचार असतो. ताण वाढले आहेत. या सगळ्यात ज्ञान चुकीच्या मार्गाने जाते.’
दोन्ही तज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे, खरोखरच आजचा काळ प्रचंड ताणाचा आहे. आईवडील, मुले सगळेच प्रचंड तणावाखाली आहेत. कदाचित काही अपवाद असू शकतील, पण जगण्याचा रेटा प्रचंड वाढला आहे. चूक की बरोबर ठरवायचे नाही, पण एकेकाळी एकत्र असलेली कुटुंबे आता विकेंद्रित झाली आहेत. विभागलेल्या जबाबदाऱ्यांचा ताण कोणा एक-दोघांवरच येऊ लागला. मुलांवर संस्कार करावेत, असे कोणाला वाटत नाही? पण जगण्याच्या रेट्यामुळे धावणाऱ्या माणसाकडे तेवढा वेळ कुठून असायला? मग मुलांच्या गरजा भागवण्यासाठी पैसा ओतला जाऊ लागला. वयाप्रमाणे मुले त्यालाच “प्रेम’ समजू लागली, त्यालाच सर्वस्व मानू लागली तर दोष कोणाचा? अशावेळी परिस्थितीला दोष देऊन सगळे मोकळे होतात. पण खरेच आपण इतके व्यग्र असतो का? जगण्याचा रेटा बरोबरच आहे, पण त्यातून, आपल्या ताणतणावांतून थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न तरी करतो का? याचाही विचार करायला हवा.
डॉ. बापट म्हणतात तेच खरे, “ताण वाढतो आहे, हे खरे. पण शांत राहून मार्ग काढण्याची क्षमताही कमी होऊ लागली आहे. प्रलोभने म्हणजे आनंद नव्हे. आनंद हा कष्ट करून मिळवायचा असतो, हे सांगायचे राहून जाते आहे.’ याबाबत पालक किंवा मुले या कोणालाही दोष द्यायचा नाही. पण विचार कमी पडतो आहे. समतोल साधला जात नाही, हे नक्की. ते झाले तर कुटुंबाला पुन्हा पहिला सूर गवसू शकेल… कदाचित!
प्रासंगिक
– ऋता बावडेकर