बारामती, (वार्ताहर)- ‘नमो रोजगार मेळाव्यासाठी बारामती शहरात येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जेवणाचे आमंत्रण दिले होते. गोविंदबागेत त्यांना आमंत्रण दिल्याने तर्क- वितर्क सुरू झाले होते. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्र लिहित शरद पवार यांच्या आमंत्रणाला विनम्रपणे नकार कळवला आहे. या पत्रानंतर बारामतीमधील डिनर डिप्लोमसीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
शनिवारी (दि. 2) मार्च रोजी बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीमधील नेत्यांना जेवणाचे आमंत्रण दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर फडणवीस यांनी व्यस्ततेचे कारण देत निमंत्रणाला नकार दिला आहे. व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही, असे फडणवीसांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी पत्र देखील लिहिले आहे.
काय लिहिले आहे पत्रात ?
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांना पत्र लिहून विन्रमतेने नकार कळावला आहे. पत्रामध्ये लिहिले आहे की, आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि त्यानंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस व्यस्त असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी शरद पवार यांना दिले आहे.