पुणे – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला. न्यायालयाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. त्यामुळे अद्यापही आमदारांच्या अपात्रतेचा प्रलंबित आहे. यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याप्रकरणावर भाष्य केले आहे.
‘शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार नाही. हे 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही’, असे विधान अजित पवार यांनी केले. या विधानाची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी यावर काही बोलू शकत नाही. हे प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे यावर सुनावणी होणार आहे. याबाबत जो काही निर्णय द्यायचा आहे, तो निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील.पण एक अभ्यासक, एक वकील आणि 25 वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला आता समजलं आहे की, पोपट मेला आहे. तरी देखील तो मान आणि हात-पाय हलवत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलत आहेत. अशा गोष्टी बोलणं त्यांना सहाजिकच आहे. कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवावं लागतं की, आशा जिवंत आहेत.”
काय म्हणाले होते अजित पवार ?
“288 पैकी 16 आमदारांचा निकाल समजा वेगळा लागला तरी त्या निकालाचा सरकारच्या बहुमतावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण 288 पैकी 16 आमदार अपात्र ठरले तर 272 आमदार राहतात. त्यामुळे सरकारकडे बहुमताचा आकडा कायम राहतो. आमदारांच्या अपात्रतेचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असे सध्या तरी दिसत आहे”, असे स्पष्ट मत यावेळी अजित पवारांनी व्यक्त केले होते.