मुंबई :- मुंबई कॉंग्रेस बैठकीत लोकसभा आणि विधानसभानिहाय आढावा घेणार आहोत. भाजपला केंद्र व राज्याच्या सत्तेतून बाहेर काढण्याच्या प्लॅनिंगचा आढावा घेणार आहोत. मग आम्ही मित्र पक्षाशी बोलणार आहोत, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. भाजप मतविभाजनाचे राजकारण अनेक वर्षांपासून करीत आहे. पुण्यात पोटनिवडणूक लागू तर द्या. आमचा प्लॅन तयार आहे. नंतर सगळे बसून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, विधानसभेत घोषणा करूनही गेल्या सहा महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानभरपाई दिलेली नाही. आवळा देऊन कोहळा काढण्याचे प्रकार सरकारने बंद करावे, असे पटोले यांनी सरकारला सुनावले.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत बदल करीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण ही योजना म्हणजे लबाडाचे जेवण आहे. जेवल्याशिवाय काही खरे नाही अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली.