सोलापूर जिल्ह्यातील स्थिती : नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना बसला फटका
पुणे – गेली दोन वर्षे सातत्याने पडलेला दुष्काळ, चारा छावण्यांमध्ये जनावरांकरिता वापरलेला ऊस यामुळे सोलापूरमधील साखर कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील 11 कारखाने ऊस टंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा अशी सोलापूरची राज्यात ओळख आहे. मात्र, गेली दोन वर्षे सातत्याने या जिल्ह्याने दुष्काळ अनुभवला आहे. तर यंदाच्या वर्षी दुष्काळावर मात करण्यासाठी उभारलेल्या छावण्यांमधील जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याकरिता बराचसा ऊस वापरला गेला आहे. मात्र, या जिल्ह्याला अवकाळी पाऊस वरदान ठरला आहे. त्यामुळे उसाला जीवदान मिळाले असले, तरीदेखील हा ऊस गाळपासाठी परिपक्व झालेला नाही.
साखर आयुक्तालयांकडून जिल्ह्यातील 33 कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. मात्र, त्यापैकी अवघ्या 14 कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गाळप सुरू केलेल्या अन्य कारखान्यांचे गाळप केवळ 30 ते 40 टक्के क्षमतेने सुरु आहे. गाळप हंगामातील सातत्य टिकवून ठेवण्याकरिता उसाचा सातत्याने पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र, ऊस पुरवठ्यात सातत्य नसल्याने हे कारखाने मेटाकुटीला आले आहेत.
जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू होऊन 27 दिवसांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत 22 कारखान्यांनी महिनाभरात 93 कोटी 24 लाख 79 हजार 773 मेट्रीक टन 10 लाख 2 हजार 570 पोत्यांचे उत्पादन केले आहे. तर उर्वरित 11 कारखान्यांसमोर गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ऊसाऐवजी अन्य पिकांच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. त्यातच जनावरांसाठी चारा छावण्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात ऊस दिल्याने जिल्ह्यात ऊसाची कमतरता जाणवत आहे.