नवी दिल्ली: जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर आंतरराज्य वाहतूक विनाव्यत्यय होणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही काही राज्यातील सीमावर ट्रक अडवून त्यांच्याकडून या ना त्या कारणाने पैसे घेतले जात असल्याचा आरोप ट्रकचालकांनी केला आहे. या विषयात पंतप्रधानांनी लक्ष घालावे असे ट्रक चालकांनी म्हटले आहे.
95 लाख ट्रक चालकांची संघटना असलेल्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही राज्यात विशेषत: मध्यप्रदेशात आंतरराज्य सीमावर ट्रक अडवून 1200 रुपये तीन 3 हजार रुपयांची मागणी केली जाते. न दिल्यास काहीतरी कारण सांगून ट्रक थांबविला जातो. जीएसटीनंतर विभागीय वाहतूक कार्यालयाच्या चेकपोस्टची गरज राहिलेली नाही.
मात्र तरीही काही राज्यात असे चेक पोस्ट आहेत. यामुळे गरीब ट्रक चालकांना त्रास होत असल्याने पंतप्रधान कार्यालयाने यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. रोज कोट्यवधी रुपये या सिंडिकेटच्या हातात जातात.
राजस्थान राज्यातही असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. 85 टक्के ट्रक चालकाकडे पाच पेक्षा कमी ट्रक आहेत. त्याचबरोबर यातील 65 टक्के ट्रक ग्रामीण भागातील आहेत. त्यांची पिळवणूक करण्यात येत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी ताबडतोब आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने पुढाकार घ्यावा, असे या पत्रात म्हटले आहे.