वाघोली (पुणे) – वाघोली परिसरात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा व थकीत बिलांमुळे वीज कनेक्शन तोडण्यास सुरु असलेली मोहिम यामुळे वाघोलीतील नागरिकांमध्ये महावितरणविरोधात असंतोष वाढत चालला आहे.
ग्राहकांचे वीज कनेक्शन न तोडता दोन टप्प्यांमध्ये वीजबिल भरण्याची मुदत द्यावी, अशी मागणी भाजपचे संदीप सातव यांनी केली आहे. तसेच वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
उन्हाचा तडाखा वाढत चालला असल्याने वाघोली परिसरात विजेची मागणी देखील वाढली आहे. यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून महावितरणच्या कारभाराविरोधात बोलू लागले आहेत. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व वीज ग्राहकांच्या वाढलेल्या संख्येमुळे वाघोली महावितरण कार्यालयामध्ये प्रचंड ताणताणाव पाहायला मिळत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे वाघोलीतील नागरिक साखळी उपोषण करून सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी करीत आहेत.
आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा कालावाधी राहिला असल्याने महावितरणने वीज वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. करोनामुळे अगोदरच हैराण झालेले सर्वसामान्य त्यातच ग्राहक, दुकानदारांचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे मोठा फटका बसत आहे. महावितरणने 15 दिवसांची मुदत देऊन 2 टप्प्यामध्ये बिले भरण्याची मुदत द्यावी. बळजबरीने वीज कनेक्शन तोडल्यास महावितरण विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात येईल असा इशाराही भाजपचे संदीप सातव यांनी महावितरण कार्यालयाला दिला आहे.
Remarks :
वाघोली