मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळात मोठे बदल होणार, या चर्चांना उधाण आलं आहे. यात गृहमंत्री बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. पूजा चव्हाण आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे असलेलं गृहखातं काढून घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पदासाठी राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची नावं आघाडीवर असताना त्यात आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं नावही जोडलं गेलं आहे.
अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी अजित पवार किंवा जयंत पाटील या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांपैकी एकाकडे गृहमंत्रालयाचा कारभार जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे गृहमंत्रिपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याऐवजी करोना काळात राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणाऱ्या राजेश टोपेंकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्याचा शरद पवार यांचा विचार आहे.
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यास गृहमंत्रिपदासाठी राजेश टोपेंचे नाव आघाडीवर असेल, तसेच गृहमंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. टोपे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने करोना काळात चांगले काम केले आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर कमी ठेवण्यात महाराष्ट्र सरकारला यश आले आहे. राजेश टोपे यांना चांगल्या कामामुळं बढती मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. टोपे हे घनसावंगी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असून याआधी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद भूषविलेलं आहे.