रेडा – इंदापूर तालुक्यातील दुष्काळाची बिकट स्थिती लक्षात घेऊन सरकारने चारा छावण्यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
खोरोची (ता. इंदापूर) येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या तिसऱ्या छावणीचा शुभारंभ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. इंदापूर तालुक्यात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने चारा टंचाईचे संकट कायम आहे. पाऊस झाल्यानंतरही चारा तयार होण्यास किमान दीड ते दोन महिने कालावधी लागणार आहे.
राज्य सरकारने 1 ऑगस्टपर्यंत चारा छावण्यांना मुदतवाढ दिलेली आहे. सध्या नीरा-भीमा कारखान्याच्या शहाजीनगर व शिरसटवाडी येथे छावण्या सुरू आहेत. छावण्यांना मुदतवाढ द्यावी, या मागणीचे निवेदन सरकारला देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विकास पाटील, अजिनाथ पाटील, महादेव घाडगे, विश्वासराव काळकुटे, भीमराव काळे, भाऊसाहेब काळकुटे, राहुल कांबळे, महावीर गांधी, शहाजीराव पाटील, अभिजित पाटील, दयानंद गायकवाड, तुकाराम बर्गे, पमू बोराडे, आप्पा पाटील, संतोष साखरे, दिनेश हेगडकर, मोहन पाटील, राजीव भाळे, संपत सरक, सदाशिव किसवे, शेतकरी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.