नवी दिल्ली : विरोधक देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. काश्मिर शांत आहे आणि जगाने भारताची बाजू मान्य केली आहे, अशा वेळी काही जण देशात अराजक आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना लवकरच उघडे पाडले जाईल, असेही ते म्हणाले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभर निदर्शने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जावडेकर बोलत होते. ते म्हणाले, कॉंग्रेस अल्पसंख्यांकांचा वापर वर्षानुवर्ष मतपेढी म्हणून करत आहे. आता ते देशाचे धार्मिक विभाजन करण्याच्या प्रयत्नात आहेत.
आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी केलेल्या विधानाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. त्यात गोगोई यांनी भाजपा नेत्यांचा उल्लेख हिंदू जिना असा केला आहे. जावडेकर पुढे म्हणाले, जेएनयुमध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी आधीच सुरू केली आहे. विद्यापीठाच्या आवरात झालेल्या निदर्शनावेळी काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्र काश्मिरच्या घोषणा दिल्या.