पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेतील चुकांची विषय तज्ज्ञांमार्फत तपासणी होणार आहे. यासाठी 22 व 23 जानेवारी रोजी विषय तज्ज्ञांची खास कार्यशाळा घेणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क घेण्यात येते. सर्वसाधारण, इतर मागास वर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी एका पेपरला 500 रुपये व दोन्ही पेपरसाठी 800 रुपये शुल्क घेण्यात येते. अनुसूचित जाती व जमाती, अपंग विद्यार्थ्यांकडून एका पेपरसाठी 250 तर दोन्ही पेपरसाठी 400 रुपये याप्रमाणे शुल्क घेण्यात येते. या प्रवेश शुल्कातून परीक्षा परिषदेकडे सुमारे 13 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे.
दरवर्षी या परीक्षेतून कोट्यवधी रुपये जमा होत असतानाच प्रश्नपत्रिकेतील चुकांची परंपरा यंदाही कायम आहे. प्रश्नपत्रिका तयार करताना विविध विषय तज्ज्ञांकडून बंद पाकिटात प्रश्न मागविण्यात येतात. हे सर्व एकत्रित करून अंतिम प्रश्नपत्रिका तयार होते. ए,बी,सी,डी अशा चार स्वरुपांत प्रश्नसंच तयार करून प्रश्नपत्रिका बनविण्यात येतात. प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जरी समान असले तरी त्याचे अनुक्रमांक मात्र बदलण्यात येतात.
प्रश्नपत्रिका टाईप झाल्यानंतर त्यातील शुद्धलेखन व इतर तपासणी करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नियुक्त नाही. प्रश्नपत्रिका गोपनीय राहव्यात यासाठी त्या कोणालाही पाहता येत नाहीत. यामुळे प्रश्नपत्रिकांमध्ये चुका झाल्या आहेत.
एका विषयासाठी दोन विषय तज्ज्ञ नियुक्त केले आहेत. त्यांच्यामार्फत प्रश्नपत्रिकेबाबत तपासणी अहवाल दाखल झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. चुकीचे प्रश्न त्वरीत रद्द होणार आहेत. अंतरिम उत्तर सूची प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर आक्षेप मागविण्यात येणार आहेत. त्यातील पात्र आक्षेपांची गांभीर्याने दखल घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.