पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे परिमंडळात वीजेची मागणी तब्बल ५०० मेगावॅटने वाढली आहे. त्यामुळे वीज पुरवठा करताना महावितरणची दमछाक होत आहे. या वाढीव मागणीचा वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे. यातून महावितरणला काही ठिकाणी वीजपुरवठा बंद ठेवावा लागत आहे.
वीजपुरवठ्यातील व्यत्यय टाळण्यासाठी तांत्रिक कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. पुणे परिमंडळाची उन्हाळ्यातील दैनंंदिन मागणी २६०० मेगावॅट आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून ही मागणी ३१०० मेगावॅट पर्यंत पोहचली आहे.
राज्यासह पुणे शहर, जिल्ह्यातही उन्हाची दाहकता वाढली आहे. पर्यायाने विजेचा वापरही वाढला आहे. तसेच, वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसत आहे, अशा स्थितीत काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. त्या ठिकाणी तातडीने वीजेची पर्यायी व्यवस्था करण्यात दिरंगाई होत आहे.
उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढते, हे माहिती असताना त्यादृष्टीने महावितरणने नियोजन करणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुणे परिमंडळातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, आंबेगाव जुन्नर तालुक्यासह, हवेली ग्रामिण भागात वीजेची मागणी वाढली आहे.
यंत्रणा अॅक्शन मोडवर…
वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून गुरूवारी (दि. १८) महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली. महापारेषणच्या लोणीकंद ४०० केव्ही उपकेंद्रातील काठापूर व आळेफाटा २२ केव्ही वीजवाहिन्यांचा भार हा बाभळेश्वर ४०० केव्ही उपकेंद्रावर देण्याचा निर्णय झाला. शुक्रवारी (दि. १९) रात्री उशिरा हे काम पूर्ण होईल.
या उपायामुळे मंचर विभागातील प्रामुख्याने शेतीपंपांसह इतर सर्व ग्राहकांना सुरळीत वीज उपलब्ध होईल. चाकण व तळेगाव अतिउच्चदाब वीजवाहिन्यांना फायदा होणार आहे. गणेशखिंड येथील एनसीएल १३२ केव्ही उपकेंद्रातील काही वीजभार फ्लॅगशिप २२० केव्ही उपकेंद्राकडे वळविण्यात येत आहे. राजगुरुनगर विभागातील तळेगाव, कामशेत, पवना येथील वीजवाहिन्यांना खोपोलीवरून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.