पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्चित करण्यात आलेल्या कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी, एखतपूर, पारगाव, उदाचीवाडी आणि वनपुरी सात गावांमधील गावठाण क्षेत्र वगळण्यात आले आहे.
पुरंदर विमानतळासाठीच्या जागेपासून ते सर्व प्रकाराच्या मान्यता यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकराकडून देण्यात आला आहेत. केवळ भूसंपादन हा एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. विमानतळासाठी आवश्यक भूसंपादनासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा प्रशासनाने केली आहे. मात्र, मोबदला ठरला नसल्याने तसेच करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे काम थांबले आहे.
विमानतळासाठी कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी, एखतपूर, पारगाव, उदाचीवाडी, वनपुरी या गावातील जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेचे एअरपोर्ट ऍथॉरिटीने “ओएलएक्स’ सर्व्हेक्षण करून घेतले आहे.
मात्र, जी जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्या जागेपैकी तीस टक्के जागा हे बागायती क्षेत्र आहे. तसेच काही गावांचा गावठाणाचाही भाग त्यामध्ये येतो. तो यातून वगळावा, अशी मागणी होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर या सात गावांमधील गावठाण क्षेत्र विमानतळाच्या भूसंपादनातून वगळण्यात आले आहे.
गाव आणि भूसंपादनातून वगळलेले क्षेत्र (हेक्टर)
कुंभारवळण-15
मुंजवडी-14
खानवडी-63
एखतपूर-2
पारगाव-156
उदाचीवाडी-48
वनपुरी -2