नवी दिल्ली – मेघालयचे माजी राज्यपाल आणि मोदी सरकारवर सातत्याने टीका करणारे सत्यपाल मलिक यांची आज केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने आपल्या मुख्यालयात चौकशी केली. काही महिन्यांपूर्वी मलिक यांच्या एका वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली होती. त्यासंदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली.
जेव्हा आपण जम्मू काश्मीरचे राज्यपाल होतो तेव्हा आपल्याला एक फाइल मंजुर करण्यासाठी 300 कोटी लाच देऊ करण्यात आली होती असा दावा त्यांनी केला होता. आपल्याकडे अशा दोन फाइल मंजुरीसाठी आल्या होत्या. त्यातील एक अंबानी यांच्याशी संबंधित होती तर दुसरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत व्यक्तीची होती.
ती व्यक्ती भारतीय जनता पार्टी आणि पीडिपीच्या सरकारमध्ये मंत्री होती असे ते म्हणाले होते. तेव्हा या दोन्ही फायलींमध्ये घोटाळा आहे असे आपण आपल्या सचिवांना सांगितले होते व त्या दोन्ही फायली रद्द केल्या होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा केली होती.
जेव्हा आपण हा प्रकार त्यांच्या कानावर घातला तेव्हा भ्रष्टाचाराशी कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना आपल्याला मोदी यांनी दिल्या होत्या अशी माहितीही तेव्हा मलिक यांनी दिली होती. त्यांच्या या आरोपांनंतर केंद्र सरकारने सीबीआयला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार आता त्यांच्याकडच्या याची विचारणा केली जाते आहे.