प्रशांत जाधव
सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे; जयकुमारांची वाट “ना अवघड, ना सोपी’
सातारा – सातारा जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ असलेल्या माण-खटावमध्ये सध्या कोण कोणत्या पक्षात जाणार, कुणाला उमेदवारी मिळणार, कुणाचे काय ठरणार, अशी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर इच्छुकांचे व कार्यकर्त्यांचे दावे-प्रतिदावे दावे सुरू आहेत. माजी आमदार जयकुमार गोरे नुकतेच भाजपमध्ये गेले असले तरी “वरून’ लादलेला उमेदवार आम्हाला नको, असे म्हणत मूळ भाजपवासी वेगळी वाट चोखाळू शकतात. अशात जयकुमारांचे पूर्वीचे अनेक शिलेदार त्यांच्यापासून दूर गेले आहेत. या परिस्थितीत त्यांची वाट अवघड नसली तरी वाटते तेवढी सोपीसुद्धा नाही.
एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात कायम गृहीत धरला जाणार माण मतदारसंघ 2009 मधील पुनर्रचनेनंतर झपाट्याने चर्चेत आला. सदाशिवराव पोळतात्यांचा हुकमी अंमल असलेल्या या मतदारसंघात त्यांनी दगड उभा केला तरी आमदार होत होता, असे जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते. मात्र, 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना आणि पोळतात्यांचे उतारवय यामुळे त्यांना राजकीय मर्यादा आल्या.तत्कालीन स्वकीयांनीही तात्यांना दगा दिला. त्यामुळे या मतदारसंघात गोरे पर्वाची सुरुवात झाली. सांगलीतून आलेल्या जयकुमार गोरेंनी 2007 मध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची मागणी तात्यांकडे केली होती (असे तात्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते). मात्र, बदलत्या राजकारणाची चाहुल लागली नसल्याने तात्यांनी उमेदवारी नाकारली. मात्र, हेच जयकुमार गोरे नंतर माणच्या राजकारणात “किंग’ ठरले. जयकुमार गोरेंनी कॉंग्रेसच्या तिकिटावर आंधळी जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्याच दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बंधू अंकुश, शेखर गोरे, पंचायत समितीचे तत्कालीन सभापती जगन्नाथ जाधव, प्रा. विश्वंभर बाबर, हरिभाऊ जगदाळे यांना बरोबर घेऊन अनेक घडामोडी घडवल्या.
आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी गोरे बंधूनी माण-खटाव या तालुक्यांमध्ये रान उठवले होते. एकीकडे थकलेले तात्या, माझी इच्छा पूर्ण करा, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घालत असताना दुसरीकडे ऐन तारुण्यात असलेले गोरे बंधू माणच्या मातीचा स्वाभिमान जपण्यासाठी आल्याचे आक्रमकमपणे सांगत होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत गोरेंनी विजय मिळवला. 2014 सालीही त्या यशाची जयकुमार गोरे यांनी पुनरावृत्ती केली. मात्र, आता राजकीय चित्र बदलले आहे. मागील दोन टर्म जिंकलेल्या जयकुमार गोरेंना यंदाची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. अनेक संदर्भ बदलले आहेत. त्यावेळी सहकाऱ्यासंमवेत “बॅक स्टेज’ सांभाळणारे शेखर गोरे हेच आज प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले आहेत.
कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेल्या जयकुमारांची या पक्षातील वाटही सोपी नाही. कारण माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल देसाई आणि मूळचे भाजपचे कार्यकर्ते यांना कॉंग्रेमधून आलेला हा पाहुणा नको आहे. त्यातच जयकुमार गोरेंच्या राजकारणात सुरुवातीला साथ देणारे कार्यकर्ते आज त्यांच्यासोबत नाहीत. पद व पैशाच्या ताकदीवर सर्व काही जिंकण्याचे मनसुबे जयकुमार गोरे आखत असले तरी त्यांचा कोणताच मनसुबा यशस्वी होऊ देणार नसल्याचे अंतर्गत विरोधकांकडून बोलले जात आहे. शेखर गोरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर हक्क सांगितला तर निमसोडकर देशमुखांनी रासपच्या दरबारात वजन ठेवले आहे. डॉ. येळगावकर, अनिल देसाई या भाजपमधील विरोधकांसह बिथरलेल्या राष्ट्रवादीचीही जयकुमारांना टक्कर देण्याची मानसिकता आहे. त्यामुळे जयकुमार गोरे आमदारकीची “हॅट्ट्रिक’ करणार की, सगळे विरोधक मिळून त्यांना “रन आऊट’ करणार, याचीच चर्चा मतदारसंघातील गावागावात आहे.