पिंपरी– निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत गेल्या काही दिवसांपासून कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू होत आहे. याबाबत दैनिक प्रभात ने संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर पशू वैद्यकीय विभागाने घटनास्थळी जाऊन मृत कावळ्यांचे नमुने ताब्यात घेतले. हे नमुने तपासणीसाठी औंध येथील रोग तपासणी (डिसीस इन्वेस्टींगेशन सेक्शन) विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.
निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे अत्यंविधीच्या निमित्ताने नागरिक येतात. तसेच, येथे काही कामगारही आहेत. काही दिवसांपासून रोज चार ते पाच कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने सहा मृत कावळ्यांचे नमुने ताब्यात घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात बर्ड फ्लूच्या घटनांनी खळबळ उडाली होती. मात्र, काही दिवसानंतर परिस्थिती निवळली. आता परत पिंपरी-चिंचवड शहरात कावळ्यांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाला आहे.
निगडी येथील अमरधान स्मशानभूमीतील सहा मृत कावळ्यांचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. यांचा मृत्यू वातावरण बदलामुळे झाला असावा, असे प्राथमिक पाहणीतून दिसून येते. मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. याबाबतची अचूक माहिती तपासणी नंतर मिळेल.
– अरुण दगडे, पशूवैद्यकीय अधिकारी, पिपरी-चिंचवड महापालिका