आता सुखाचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. ते मिळवायचेही वेगवेगळे मार्ग आहेत. एकत्र राहण्यातून आनंद, सुख कसे शोधावे? कशावर लक्ष द्यावे?… तर आपल्याबरोबर असणाऱ्यांमध्ये कॉमन, सर्वसाधारण अशी कोणती गोष्ट आहे? ते लक्षात घ्यावे. मी कसा सुखी होईल किंवा प्रत्येकाला सुखी कसे होता येईल, त्यापेक्षा आपण जेव्हा एकत्र असतो तेव्हा अधिक आनंद वाटतो हे लक्षात घ्यावे.
कधीकधी आपण उगाचच दुःखाला कुरवाळत राहतो. असे म्हणतात की, चिता माणसाला एकदाच जाळते, चिंता मात्र आयुष्यभर जाळत राहते. तेव्हा नसत्या चिंता करायचे सोडून द्या. जास्त चिंता, भय बाळगणाऱ्या व्यक्तींविषयी विज्ञानाने प्रयोग केले तेव्हा, असे लक्षात आले की, जोपर्यंत फक्त कल्पनेने मनुष्य चिंता करतो तेव्हा त्या चिंतेची पातळी फार वाढते. म्हणजे पहा, घरातले माणूस बाहेर गेले की, काहीजणांची चिंता सुरू होते की, सुरक्षित येणार का परत? अपघात झाला तर? किंवा आपल्या मुलाला चांगले मार्क मिळाले नाहीत तर? खरे तर असा विचार करून आपण आपला वेळ उगाचच दुःखात घालवत असतो. त्यातून निष्पन्न तर काहीच होत नाही. तेव्हा काल्पनिक दुःखाच्या भराऱ्या मारून उगाच सुखाचा जीव दुःखात का घालायचा?
सृष्टीचा हा नियम आहे की, जे निर्माण होते, ते संपणार असते. उत्पत्ती आणि लय. आता आपल्याला त्रास होत असला तरी नंतर त्याचे निवारण होणारच असते. एखाद्या वर्षी नापास झाले, एखाद्या प्रसंगी माघार घ्यावी लागली, तर जणू आयुष्यच संपले; असे वाटते काहीजणांना. मग निराशेच्या आणि दुःखाच्या डोहात ते खोलखोल बुडत जातात. कुठलेच दिवस कायम राहत नाहीत. सुखाचे दिवस नाही का संपले? मग हे दुःखाचेपण दिवस कधीतरी संपतीलच की! किती तर्कशुद्ध विचार आहे हा. पण हा साधा विचार करण्याचेसुद्धा आपले मन कधीकधी नाकारते. पण एक गाणे आहे,
“अशी न राहील रात्र निरंतर
प्रकाश येतो रात्रीनंतर…’
तेव्हा हे आपण कधीही विसरता कामा नये की, रात्र संपणार आहे. दिवस उजाडणार आहे आणि प्रकाश येणार आहे. आशेचे किरण दिसणार आहेत.
लौकिक किंवा व्यावहारिक गोष्टी कितीही मिळाल्या तरी, आणखी मिळतील का? मिळालेल्या पुरतील का? हे प्रश्न भंडावतच राहतात. ययाती राजाचे उदाहरण आपल्याला माहीत आहे. सर्व सुखे त्याने उपभोगली. पण तरी त्याची तृप्ती झाली नाही. त्याने एक वर मिळवला आणि त्याचा उपयोग करून वृद्धत्वाचा त्याग केला आणि आपल्या मुलाचे तारुण्य घेतले. इतके करूनही अखेरपर्यंत तो असमाधानीच राहिला.
पैसा, अधिकार, तारुण्य या गोष्टी आज ना उद्या आपल्या दुरावणारच आहेत. इतकेच काय आपले आयुष्यच एक दिवस संपणार आहे. म्हणून व्यावहारिक गोष्टींचा हव्यास कमी करून त्याऐवजी आपल्याला आत्मिक समाधान देणाऱ्या गोष्टी शोधाव्यात. त्या संपादन केल्या तर इतर सर्व गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात. तुमच्या हृदयातील चैतन्याचा झरा हाच खरा आनंद! तो चिरंतन ठेवू या!
– माधुरी