पुणे – संचारबंदीच्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक कर्मचारी, अधिकारी मुख्यालय सोडून दुसऱ्या गावांमध्ये गेले आहेत. या सर्वांनी सोमवारपर्यंत विद्यापीठात हजर राहावे, असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.
याबाबतचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले आहे. करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संचारबंदी सुरू झाल्यावर पुणे आवारात रहाणारे अनेक कर्मचारी, अधिकारी विद्यापीठ सोडून बाहेर गेले आहेत. ज्यांना बाहेर जायचे होते, त्यांनी परवानगी घेऊन विद्यापीठ सोडणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे 200 जण पुण्याबाहेर आहेत. त्याचा परिणाम विद्यापीठाच्या कामकाजावर होत आहे.
या कर्मचारी व अधिकारी यांना परत येण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने ते तिकडेच अडकून पडले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने यासंदर्भात पत्र दिले, तर आम्हाला पुण्यात परत येता येईल अशी विनंती प्रशासनाला केली होती. पुणे विद्यापीठात परीक्षा, नवीन शैक्षणिक वर्ष, अभ्यासक्रम यासह इतर महत्त्वाची कामे सुरू आहेत. अशा काळात विद्यापीठात राहणाऱ्यांची गरज पडत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 17 मेपर्यंत परत यावे आणि रूजू झाल्याचा ई-मेल करावा, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना प्रवासाचा परवाना मिळविण्यासाठी ओळखपत्रासह हे परिपत्रक उपयुक्त ठरेल, असे कुलसचिवांनी म्हटले आहे.