लोणावळा (वार्ताहर) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोणीही रस्त्यावर बाहेर पडत नसल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. त्यातच सहाआसनी रिक्षा, वडाप वाहने यावर या लॉकडाऊन काळात बंदी घालण्यात आल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालक या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लोणावळा हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांचा सारखा राबता असतो. या पर्यटकांच्या जीवावर येथील हॉटेल आणि चिक्की व्यवसायासोबतच रिक्षा व्यवसाय आणि खासगी प्रवासी वाहनांचा अर्थात टुरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मात्र गेल्या दीड ते पावणेदोन महिन्यापासून लॉकडाऊन परिस्थितीमुळे एकही पर्यटक फिरकलेला नाही. त्यातच सहाआसनी रिक्षा, वडाप वाहने यांनाही बंदी घालण्यात आल्याने, स्थानिक प्रवाशी वाहतूक देखील करता येत नाही. आणि त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या वाहन चालक आणि मालक यांचे अर्थकारण बिघडले आहे.
लोणावळा आणि लोणावळा ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्षासह खासगी टुरिस्ट टॅक्सी चालवून चरितार्थ चालविणारा वर्ग हजारोंच्या संख्येने आहे. या सर्वांवर भयानक परिस्थिती ओढवली आहे.वाहने खरेदी करण्यासाठी बॅंकांकडून कर्ज घेतले, त्याचे दरमहा हप्ते द्यायचे आहेत, घरभाडे द्यायचे आहे, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होतील, अशा एक ना अनेक समस्यांनी वाहनचालकांना ग्रासले आहे. बाहेर पडले, तर करोनाची भीती आणि घरात बसले तर स्वतः सोबत आपल्या कुटुंबाची उपासमारीची भीती अशा द्विधा मनस्थितीमध्ये हे सर्व रिक्षा चालक आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून, अनेक व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी ही कायम आहे. अशा परिस्थितीत माय-बाप सरकारनेच आमचे काय करायचे ते ठरवावे, असा आर्जव सर्व रिक्षाचालक आणि टुरिस्ट टॅक्सी शासनाकडे करीत आहेत.