बावडा-इंदापूर – अकलूज मार्गावरील बावडा ते अकलूज रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा रस्ता प्रवाशांच्या जीवावर बेततोय असे नागरिकांमधून बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम प्रशासनाची याकडे दुर्लक्ष होत आहे. असा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
बावडा ते अकलूज या नऊ किलोमीटर अंतराच्या मार्गावर इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या बावडा ते सराटी या पाच किलोमीटरच्या अंतरात रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या संदर्भात बावडा व परिसरातील ग्रमस्थांनी यापूर्वी अनेकदा लेखी व तोंडी स्वरूपात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.
या मार्गाची आजच नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून हीच अवस्था आहे. या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांनी आपले अवयव गमवावे लागले. त्यातच हेच खड्डे बुजवण्यासाठी मोठी खडी अंथरल्याने प्रवासी आणि चालकांच्या अडचणी आणखीणच वाढल्या आहेत.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.