नवी दिल्ली -: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा उल्लेख केला. यावेळी सहाजिकच भारतीय संघाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या नावाचा बोलबाला झाला.
ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत दिग्गज क्रिकेटपटूंना तोंडात बोट घालायला लावली. पहिल्या सामन्यात निच्चांकी ३६ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. तसेच कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. या कामगिरीबद्दल भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे देशाचे सर्वोच्च सभागृह अर्थात राज्यसभेत आणि लोकसभेत कौतुक करण्यात आले.
याआधी अजिंक्य रहाणे आणि भारतीय संघाचं राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील कौतुक करण्यात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात भारत-ऑस्ट्रेलिया मालिकाचा उल्लेख करत भारतीय संघाचं कौतुक केलं. भारतीय संघाने क्रिकेटच्या मैदानात अत्यंत प्रतिकूल स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला. भारतीयांसाठी देखील मागचं वर्ष अत्यंत खडतर होते. त्यातून भारतीयांनी मार्ग काढला असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले होते.