मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्याविषयी झालेली वादग्रस्त वक्तव्ये, महागाई आणि बेरोजगारीविरोधात महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चासाठी अद्यापही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. त्यावर परवानग्या मिळाल्या नसल्या तरीही महामोर्चा होणारच, असा ठाम निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला.
यावर विचारविमर्ष करण्याकरता आज महाविकास आघाडीच्या नेत्यांती बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मविआतील नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, हा राजकीय मोर्चा नाही.
राजकीय पक्षांसह अनेक समाजिक संस्था, अराजकीय मान्यवर या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चात विध्वंसक काहीही होणार नाही. शांततेत हा मोर्चा निघणार आहे. मोर्चासाठी परवानग्या मागितल्या आहेत. परवानग्या हातात आल्या नाहीत पण येतील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हा मोर्चा समस्त महाराष्ट्रातील जनतेचा आहे. जनतेने मोठ्या संख्यने मोर्चाला उपस्थित राहण्याच आवाहन त्यांनी केले.
सीमावादाबाबत ते म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कर्नाटककडून रोहतगी बाजू मांडणार आहेत. ते देशातील ज्येष्ठ वकिलांपैकी एक आहेत. तसेच, आपली बाजू मांडण्याकरता आपण हरिष साळवेंकडे प्रकरण द्यावे, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, हरिश साळवे यांनाही पत्र लिहिले आहे. हरिश साळवे हे महाराष्ट्राचे, विदर्भाचे सुपूत्र आहेत. ज्येष्ठ वकिलांमध्ये त्यांचीही गणती होते. त्यामुळे त्यांचा नावाचा विचार व्हावा, अशा आशयाचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल?
महाविकास आघाडीच्या मोर्चाला आडकाठी आणणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने जे जे शक्य आहे ते आम्ही करू. पण महाविकास आघाडीच्या मोर्चाला आडकाठी आणणार नसल्याचे सांगत त्यांनी एक प्रकारे हिरवा कंदिल दाखवला आहे.
कसा असेल मोर्चा?
या मोर्चाला शनिवारी, सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या रिर्चड्सन क्रुडासपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. याठिकाणी पोहचल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोरील एका ट्रकवर जाहीर सभा होईल. यावेळी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील, तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, तसेच कॉंग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. यासोबत काही सामाजिक संघटना देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.