पिंपरी – बटाटा आणि कांद्याच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर झाला आहे. सातत्याने वाढ झाल्यानंतर दिवाळी संपल्यानंतर किंमती घटण्याची शक्यता होती. मात्र दिवाळीनंतरही बटाटा आणि कांद्याचे भाव कायम आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये बटाट्याचा किरकोळ दर प्रति किलो 50 रुपये आणि कांदा 50 ते 55 रुपये प्रतिकिलो आहे.
राज्यात मुसळधार पावसामुळे 40 टक्के पिकाचे नुकसान झाले आहे. साधारणत: नवरात्रीत कांद्याचा वापर कमी होतो, त्यामुळे दर कमी होत असतात. परंतु यावेळी केवळ घट कमी होण्याऐवजी वाढ नोंदवली गेली. अशा परिस्थितीत यावर्षी कांदा स्वस्त असणे कठीण आहे. देशातील कांदा टंचाईवर मात करण्याबरोबरच कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात केला आहे. कांदा परदेशातून 18 ते 20 रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे. मात्र तरीदेखील किरकोळ बाजारात कांद्याचे दर 40 ते 50 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
सध्या शहरातील 70 टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु झाली आहेत. त्यामुळे कांदा, बटाट्याला मागणी वाढली आहे. कांद्याचे दर चढेच राहिल्याने हॉटेलमधून कांद्याचा मर्यादित वापर केला जात आहे. तर बटाटा वेफर्स तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाचा बटाटा उपलब्ध होत नसल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे.
चांगल्या प्रतीच्या कांद्याचे दर वधारलेलेच असल्याने, पावसात भिजून खराब झालेला कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा कांदा काहीसा कमी दरात विकला जात असल्याने ग्राहकांकडून या कांद्याला मागणी वाढली आहे. आकाराने लहान असलेल्या कांद्याची विक्रीदेखील 40 रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. त्यामुळे कांद्याचा वापर सर्वसामान्यांच्या आहारात मर्यादितच होत आहे.