नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप इर्दोगन यांनी केलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
इर्दोगन यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आणि स्वतःच्या वैयक्तिक राजकीय अजेंड्याला अनुसरून आहे, अशी टीका परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केली आहे.
इर्दोगन यांनी दिल्लीतील हिंसाचाराचा उल्लेख करून टीका केली होती. त्यांनी भारताविरोधात अन्यही काही वक्तव्ये केली होती. त्याचाही समाचार परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आला आहे.
इर्दोगन यांची वक्तव्ये पूर्णपणे चुकीची आणि स्वतःच्या वैयक्तिक राजकीय अजेंड्याला अनुसरणारी आहेत. त्यांच्याकडून अशाप्रकारच्या वक्तव्यांची अपेक्षा नाही.
विशेषतः एखाद्या देशाच्या प्रमुख नेत्याने अशी चुकीची विधाने करणे अभिप्रेत नाही. याबाबत तुर्कीच्या राजदूतांकडे 3 मार्च रोजी निषेध नोंदवण्यात आला आहे, असेही रवीश कुमार यांनी सांगितले.
इर्दोगन यांनी अलिकडेच केलेल्या पकिस्तान दौऱ्यादरम्यान जम्मू काश्मीरच्या संदर्भाने भारतविरोधी वक्तव्ये केली होती. त्याचाही निषेध भारताने केला होता. तुर्कस्तानच्या राजदूतांना पाचारण करून त्यांच्या वक्तव्याबाबत निषेध नोंदवण्यात आला होता.