बीजिंग – पॅन्गोंग त्सो इथे चीनने अलीकडेच केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नाच्यावेळी भारतीय सैनिकांची कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असा दावा चीनच्यावतीने आज करण्यात आला. आपल्या माहितीप्रमाणे या प्रसंगी भारतीय बाजूच्या कोणत्याही सैनिकाचा मृत्यू झालेला नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुन्यिंग यांनी चीनमधील सरकारी वृत्तपत्राला सांगितले.
‘भारत-चीन सीमेवरील सहमतीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा भारतानेच भंग केला आहे. जैसे थे स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्नही केला आहे. त्यामुळे या घटनेची पूर्ण जबाबदारी भारतावरच आहे.’ असा कांगावाही चुन्यिंग यांनी केला आहे. लडाखमधील चुशुल येथील पॅन्गॉंग त्सोच्या दक्षिण खोऱ्याजवळ चीनी सैनिकांनी गेल्या महिन्यात केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला होता. त्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आज सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला.
चीनच्या या चिथावणीनंतर भारतीय बाजूकडून याची गंभीर दखल घेतली गेली आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ त्याविषयी तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. चीनने आपल्या फ्रंटलाईन सैनिकांना काबूत ठेवावे, असेही सांगितले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. प्रत्यक्ष ताबा रेषेसह सर्व प्रलंबित विषयांवर शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यास भारत कटिबद्ध आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत आणि चीन दरम्यान एप्रिल-मे दरम्यान पूर्व लडाखमध्ये फिंगर एरिया, गलवान खोरे, हॉट स्प्रिंग्ज, कोंगरुंग नाला आदी अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.