ब्रिस्टल – इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाला फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा चहापानापर्यंतचा खेळ संततधार पावसामुळे थांबला तेव्हा भारताच्या महिला संघाने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 57 धावा केल्या आहेत. डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप 108 धावांची गरज आहे.
इंग्लंडने पहिला डाव 9 बाद 396 धावांवर घोषित केल्यानंतर भारताला आपल्या पहिल्या डावात केवळ 231 धावाच करता आल्या. चार दिवसांच्या या सामन्यात दीडशे धावांचा फरक मिळाल्याने यजमान संघाने भारतीय संघाला फॉलोऑन दिला. या नामुष्कीनंतर भारताने आपला दुसरा डाव सुरू केल्यावर पहिल्या डावात तडफदार 78 धावांची खेळी करणारी स्मृती मानधना केवळ 8 धावांवर बाद झाली.
त्यानंतर पहिल्या डावातील अर्धशतकवीर शेफाली वर्माने याही डावात जबाबदारीने फलंदाजी करताना पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली. या सामन्यातही वारंवार पावसाचा व्यत्यय आला. ताजे वृत्त हाती आले तेव्हा चहापानाच्या वेळेपूर्वी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा महिला संघाने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 83 धावा केल्या होत्या. शेफाली 57, तर दीप्ती शर्मा 18 धावांवर खेळत आहेत.
या सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यामुळे पहिल्या डावात नामुष्की पत्करावी लागली. पहिल्या डावाची सुरुवात सरस झाली होती. मात्र, नंतरच्या फलंदाजांनी बेजबाबदार फलंदाजी केल्यामुळे संघ पराभवाच्या छायेत आला आहे. आता दुसऱ्या डावात संयमी फलंदाजी केली तरच सामना वाचवण्याची भारतीय संघाला संधी मिळेल.